लातूर जिल्ह्यात रेशन वाटपाला सुरुवात
जिल्ह्यात 9 हजार 62 मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप सुरू
- जिल्हा पुरवठा अधिकारी प्रदीप कुलकर्णी
रास्त भाव दुकानदार मार्फत जास्त दराने अन्नधान्य विक्री झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल
अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना व एपीएल शेतकरी योजना या योजनेचे
एकत्रित मिळुन २०,३२,९८९ लाभार्थ्यांना एकुण ५९१९.२ मे.टन गहु व ३९४२.९ मे.टन तांदूळ उपलब्ध
लातूर,दि.7:- कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात जिल्हयातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागाकडुन विविध उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत. जिल्हयातील १३५० रास्त भाव दुकानातुन माहे एप्रिल-२०२० च्या धान्याचे वितरण गतीने व सुरळीतपणे सुरू आहे. गहू व तांदूळ असे एकूण 9 हजार 62 मेट्रिक टन अन्नधान्याच्या वाटपास सुरुवात झालेली असून टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिले आहेत.
माहे एप्रिल-२०२० करिता जिल्हयातील अंत्योदय (AAY) योजनेच्या ४१,९७८ कार्डधारक व त्यावरील सदस्य संख्या २,२१,१४३ साठी प्रति कार्ड गहु-२३ किलो व तांदुळ -१२ किलो असे एकुण ३५ किलो अन्नधान्य व साखर प्रति कार्ड १ किलो या प्रमाणे लाभार्थ्यांना वितरण करण्यात येत आहे. यासाठी शासनाकडुन ९२७.५ मे.टन गहु व ४८२.६ मे.टन तांदुळ प्राप्त झाले असुन, त्याचे वितरण सुरू आहे.
तसेच माहे एप्रिल-२०२० करिता जिल्हयात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी (PHH) योजनेतील १४,९४,३२३ सदस्य संख्येस प्रति व्यक्ती ३ किलो गहु व २ किलो तांदुळ या प्रमाणे ४०३९.५ मे.टन गहु व २८२५.५ मे.टन तांदुळ प्राप्त झाला असुन सदर धान्याचे वितरण चालु आहे.
एपीएल-शेतकरी योजना कुटुंबातील ६१,७४३ कार्डसंख्येवरील ३,१७,५२३ सदस्य संख्येसाठी प्रति व्यक्ती ३ किलो गहु व २ किलो तांदूळ या प्रमाणे गहु ९५२.२ मे.टन व तांदूळ ६३४.८ मे.टन वितरीत करण्यात येत आहे.
वरील अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना व एपीएल शेतकरी योजना या योजनेचे एकत्रित मिळुन २०,३२,९८९ लाभार्थ्यांना एकुण ५९१९.२ मे.टन गहु व ३९४२.९ मे.टन तांदूळ या अन्नधान्याचे जिल्हयातील एकुण १३५० रास्त भाव दुकानांमार्फत वितरण सुरू आहे. त्याच प्रमाणे स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे २९७ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.
माहे एप्रिल-२०२० चे वरील प्रमाणे नियमित धान्य संबंधित लाभार्थीस वितरीत केल्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने (PMGKAY) अंतर्गत अंत्योदय (AAY) व प्राधान्य कुटुंब लाभार्थी (PHH) योजनेच्या संबंधित लाभार्थीस प्रति व्यक्ती ५ किलो तांदूळ रास्त भाव दुकानांमार्फत मोफत वितरीत केला जाणार आहे. यासाठी जिल्हयास ८५३५ मे.टन तांदूळ मंजुर करण्यात आलेला आहे, सदरील तांदूळाची उचल सध्या चालु आहे.
सध्या रास्त भाव दुकानांमधुन अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना व एपीएल शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना माहे एपिल-२०२० चे नियमीत धान्य वितरण सुरू आहे. सदरील नियमित धान्य घेतल्या नंतर (PMGKAY) या योजनेचा मोफत तांदूळ अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेच्या सदस्य संख्येसाठी मोफत वितरीत करण्यात येणार आहे. येत्या ३ ते ४ दिवसात रास्त भाव दुकानांना सदरील धान्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे तद् नंतर पात्र लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. हे मोफत धान्य एप्रिल-२०२० सोबतच मे आणि जुन-२०२० मध्ये सुध्दा त्या- त्या महिन्यात उपलब्ध करून दिले जाणार आहे.
PMGKAY योजने अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेच्या सदस्य संख्येसाठी वितरीत होणारे ५ किलो तांदूळ हे मोफत असुन अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना व एपीएल शेतकरी योजने अंतर्गत धान्याचा दर गहु – २ रू. प्रति किलो व तांदूळ – ३ रू. प्रति किलो व साखर (फक्त अंत्योदय कार्ड धारकांसाठी) – २० रू. प्रति किलो असा आहे. सदरील दरांपेक्षा जास्त दराने रास्त भाव दुकानदारांमार्फत विक्री होत असल्याचे निर्देशनास आल्यास संबंधित रास्त भाव दुकानांवर कडक कार्यवाही अनुसरण्यात येईल.
सर्व लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, रास्त भाव दुकानावर गर्दी न करता Social Distancing चे नियम पाळुन आपले धान्य प्राप्त करुन घ्यावे. तसेच सर्व रास्त भाव दुकानदार यांनी नियमितपणे रास्त भाव दुकान उघडे ठेवुन धान्याचे वितरण त्वरीत करावे. नागरिकांना कळविण्यात येते की, Social Media वरून फिरणारा धान्य मागणीचा अर्ज हा शासनाकडुन अथवा जिल्हा प्रशासनाकडुन देण्यात आलेला नाही, त्यामुळे अशा अफवेला बळी पडु नये असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे.
जास्त दराने वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई
जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे.मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग,वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment