निलंगा तालुक्यात मृत्यूपरांत ही मरण यातनाच...
निलंगा तालुक्यात अनेक गावात स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांचे हाल...
रस्त्यावर करावे लागतात अंतिमसंस्कार...
निलंगा तालुक्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस...
निलंगा,दि.०८
'महाराष्ट्र आणि देश वेगाने पुढे जात आहे. देशाचा अत्यंत वेगाने विकास होत आहे अशी विधानं राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांच्या तोंडून सातत्याने ऐकायला मिळतात.विकास होत आहे. हे सांगण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार करोडो रुपये जाहिरातींवर खर्च करत आहे.
मात्र दुसऱ्या बाजूला गाव पातळीवर भीषण वास्तव दिसून येत असून, लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील बोरसुरी,सावनगिरा ,मानेजवळगा, सावरी ,गुऱ्हाळ , सिरसी (हां) या गावांसह तालुक्यातील अनेक गावात स्मशानभूमी नसल्याने वर्षानुवर्षे मयतावर रस्त्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी अनेक गावातील लोकप्रतिनिधी ,गावकरी सामाजिक कार्यकर्ते यांच्या तहसील कार्यालय,पंचायत समितीत खेटे घालून चपला झिजत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासनही लाल फीतीत अडकल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
पावसाळ्यात जोराचा पाऊस सुरू असल्याने अनेक गावात अंत्यसंस्कार कोठे आणि कसे करायचे? हा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे.पावसाळ्यात पावसाने उघडीप दिल्यानंतरच रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय ग्रामस्थ व नातेवाईक घेत असतात..
अंत्यसंस्कार सुरू असताना पुन्हा जर पुन्हा पाऊस आला तर जळत्या चितेवर नागरिकांना अक्षरशः पत्रे धरुन थांबावे लागत आहे. गावात स्मशानभूमी नसल्याने वर्षानुवर्षे नागरिक हाल सहन करत आहेत.
Comments
Post a Comment